एआययू आणि एमजीएम विद्यापीठाच्या वतीने आयोजित अ.भा. आंतरविद्यापीठ सायकलिंग रोड स्पर्धेचा थाटात शुभारंभ
औरंगाबाद (प्रतिनिधी ) ––भारतीय विद्यापीठ संघटना (एआययू), सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि एमजीएम विद्यापीठ, औरंगाबादच्या वतीने आयोजित अखिल भारतीय आंतरविद्यापीठ सायकलिंग रोड स्पर्धेचा उदघाटन सोहळा सोमवारी एमजीएम स्टेडियमवर थाटात पार पडला. औरंगाबादचे पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे डीजीएम तसेच प्रकल्प संचालक रवींद्र इंगोले, एआययूचे प्रतिनिधी तसेच एनआयएस पटियाळा येथील मुख्य प्रशिक्षक व्ही. सीनुकुमार, स्पर्धा व्यवस्थापक प्रताप जाधव, मुख्य पंच धर्मेंद्र लांबा, रेस सेक्रेटरी रौशन उपाध्याय, भिकन आंबे, एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, स्पर्धा संयोजक डॉ.रवींद्र देशमुख, डॉ.दिनेश वंजारे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

अ.भा.आंतरविद्यापीठ सायकलिंग रोड स्पर्धेचे दि.१४ ते १७ फेब्रुवारी २०२३ दरम्यान सोलापूर-धुळे महामार्गावर देवळाई चौक ते झाल्टा फाटादरम्यान आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी औरंगाबाद डिस्ट्रिक्ट सायलकिंग असोसिएशन, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, औरंगाबाद ग्रामीण पोलिस विभागाचे सहकार्य मिळाले आहे. स्पर्धेत देशभरातील ४६ विद्यापीठांचे संघ सहभागी होतील. यामध्ये ३७६ खेळाडूंचा समावेश राहील. त्यापैकी १९८ पुरुष व १२४ महिला खेळाडू असतील. या संघासोबत ५४ व्यवस्थापक आणि प्रशिक्षक असतील. ही स्पर्धा महिला गटात २० किमी वैयक्तिक, ३० किमी सांघिक, ५० किमी मॅस्ड स्टार्ट प्रकारात होईल. तर, पुरुष गटात ४० किमी वैयक्तिक, ५० किमी सांघिक, क्राईटेरिअम रेस प्रकारात होईल. संपूर्ण स्पर्धा ही सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या नियमांप्रमाणे होणार असून निकोप तसेच शिस्तबद्ध स्पर्धेसाठी २० पंचांची निवड करण्यात आलेली आहे.

प्रमुख अतिथी डॉ.निखिल गुप्ता म्हणाले, युवक हे भारताचे भविष्य आहे. आपल्या आयुष्यात मेहनतीशिवाय काहीच मिळत नाही आणि यशाला कधीच शॉर्टकट नसतो. विकास खन्ना हा पंजाबमधील युवक जगातील अव्वल शेफ आहे. तो जन्मला तेव्हा त्याला क्लब सिंड्रोम होता आणि वयाच्या १३ व्या वर्षापर्यंत तो धावू शकत नव्हता. पण, आज जगात अव्वल आहे. अवघ्या १३ वर्षांचा सचिन आपल्या ध्येयासाठी लांबचे घर सोडून काका-काकूंकडे राहायला गेला आणि प्रचंड मेहनत घेतली म्हणून तो ‘क्रिकेटचा देव’ बनला. त्यामुळे मेहनत आणि संघर्षाच्या बळावर तुम्हाला काहीही साध्य करता येऊ शकते त्यामुळे प्रत्येकांनी त्यासाठी तयार राहावे, असे आवाहनही डॉ.निखिल गुप्ता यांनी केले.

अध्यक्षीय समारोपात कुलगुरू डॉ. विलास सपकाळ म्हणाले, विद्यापीठस्तरीय शिक्षणात ज्ञान, संशोधनासारख्या बौद्धिक बाबींसोबतच शारीरिक विकासासाठी अनेक बाबी अंतर्भूत असतात. यातून विद्यार्थ्यांचे करिअर घडत असते. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तसेच खेळांसाठी सोईसुविधा देत त्यांच्यातूनच देशासाठी उत्तम खेळाडू घडवण्यासाठी विद्यापीठ स्तरावरून प्रयत्न सुरू असतात. ही स्पर्धा याच उद्देशाचा भाग आहे. ही केवळ सायकलिंगची स्पर्धा नव्हे तर या माध्यमातून एक इकोसिस्टिम उभी राहते. सायकल हे पर्यावरण, जीवनशैली आणि व्यायामाच्या उद्देशाने महत्वपूर्ण आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून हे सर्व उद्देश साधण्याचा आमचा प्रयत्न आहे. सर्व खेळाडू येथून जाताना आपल्यासोबत उत्तम संदेश घेऊन जातील, असा आशावादही कुलगुरू डॉ.विलास सपकाळ यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रमुख अतिथी प्रताप पवार आणि भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे डिजीएम रवींद्र इंगोले यांनीही शुभेच्छा दिल्या. उदघानप्रसंगी सर्व विद्यापीठांच्या संघांनी एमजीएम स्कुलच्या विद्यार्थ्यांच्या बँडवर शिस्तबद्ध पथसंचलन केले. एमजीएम कोहम जिम्नॅस्टिक अकादमीच्या खेळाडूंनी विविध प्रत्यक्षिकांचे सादरीकरण केले. एमजीएम विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची लोककला ‘गोंधळ’ सादर केली. या वेळी खेळाडूंना शपथ देण्यात आली. कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर यांनी प्रास्ताविक केले. तर, स्पर्धा संयोजक डॉ. रवींद्र देशमुख यांनी आभार मानले. सूत्रसंचालन सरफराज कादरी यांनी केले. आयोजनासाठी प्रा.शशिकांत सिंग, निलेश हारदे, सदाशिव झवेरी, रहीम खान, प्रा.एल.जी.कलूरकर, प्रा.एल.के.कोकाटे, प्रा. तानाजी पवार, प्रा.संगीता भस्मे, प्रा.विजया अहिरे आदींनी प्रयत्न केले.
—