नवी दिल्ली , शिवसेना जेव्हा जेव्हा फुटली तेव्हा त्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचा हात होता,असा गंभीर आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती व शिवसेनेच्या शिंदेगटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी केला आहे.
नारायण राणे यांना शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी शरद पवारांनीच मदत केली होती असा दावाही दीपक केसरकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना केला आहे. राज ठाकरेंच्या पाठीशीही शरद पवारांचे आशीर्वाद होते असेही ते म्हणाले.
शरद पवारांनी शिवसेना का फोडली? बाळासाहेब जिवंत होते तेव्हा त्यांना यातना का दिल्या? याचं उत्तरही त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला दिलं पाहिजे,” असं केसरकर म्हणाले आहेत.

केसरकर पुढे म्हणाले की, “आपण प्रत्येक गोष्टीचे साक्षीदार आहोत. मी राष्ट्रवादीत असताना ते विश्वासात घेऊन सांगायचे. शरद पवारांनीच मला, जरी मी नारायण राणेंना बाहेर पडण्यासाठी मदत केली असली तरी कोणत्या पक्षात जावं याची अट ठेवलेली नाही असे सांगितले होते, हा निश्चितच त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. पण याचा अर्थ नारायण राणे यांना शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी पवारांनीच मदत केली होती. भुजबळांना तर ते स्वत: बाहेर घेऊन गेले होते. राज ठाकरेंच्या पाठीशीही त्यांचे आशीर्वाद होते. राज ठाकरे त्यांना मानतात,” असं केसरकरांनी सांगितलं आहे.
“मातोश्री कधी सिल्व्हर ओकच्या दारी गेल्याचं मी ऐकलेलं नाही. आपला पक्ष मोठा व्हावा, तो सत्तेत असावा ही शरद पवारांची इच्छा असणं स्वाभाविक आहे. पण बाळासाहेबांना हे कधीही मान्य नव्हतं. शिवसैनिक कधीही शरद पवारांच्या दावणीला बांधला जाणार नाही,” असं केसरकरांनी सांगितलं.

उद्धव ठाकरेंचे सल्लागार चुकीचे
शिवसेनेच्या वतीने मंत्रिमंडळाचा शपथविधी रोखण्यासाठी पत्र देण्यात आल्यासंबंधी विचारण्यात आलं असता केसरकर म्हणाले की, “लहानपणी क्रिकेट खेळताना ज्याचा बॅट, बॉल असतो तो आऊट झाल्यावर सगळं घेऊन घरी जातो. याला आम्ही रडीचा जाव म्हणायचो. हा रडीचा खेळ राजकारणात असता कामा नये. राजकारण सर्वसामान्यांसाठी असून ते त्यांच्यासाठीच केलं पाहिजे”. उद्धव ठाकरेंना चुकीच्या नेत्यांचे मार्गदर्शन होत असल्याने अशी पावले उचलली जात असावीत असेही ते म्हणाले.
बाळासाहेबांनी मी शेवटची व्यक्ती असलो तरी मी काँग्रेसमध्ये जाणार नाही, पाठिंबा देणार नाही असं सांगितलं होतं. मग त्याच बाळासाहेबांच्या शिवसेनेने काँग्रेससोबत जाणे ही त्यांच्या विचारांशी प्रतारणा आहे असे केसरकरांनी स्पष्ट केले.