अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या मध्यमा पूर्ण शास्त्रीय गायन परीक्षेमध्ये लातूर येथील कुमारी शर्वरी विवेक डोंगरे हिने सर्वाधिक गुण घेऊन देशात पहिला येण्याचा मान मिळवला आहे व तिला पंडित शंकरराव अभ्यास व पंडित अनंतराव कुलकर्णी हे दोन पुरस्कार प्राप्त झाले आहेत. नुकताच आवर्तन प्रतिष्ठानचा शतक महोत्सव साजरा झाला या महोत्सवामध्ये विख्यात गायक पद्मश्री पं.एम. वेंकटेशकुमार व आवर्तन शतकपूर्ती संगीत महोत्सवाचे स्वागताध्यक्ष माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते हे दोन्ही पुरस्कार देऊन शर्वरीला सन्मानित करण्यात आले.

कोणतीही अनुवंशिक परंपरा नसताना घरामध्ये सांगितीक वातावरण नसताना लाभलेला उत्तम निसर्ग स्वतःची मेहनत व योग्य गुरूंचे योग्य मार्गदर्शन आणि आई-वडिलांचे भक्कम पाठबळ यामुळेच हे यश शर्वरीला मिळाले आहे. शर्वरी मागील पाच वर्षांपासून लातूर येथील आरोह संगीत अकादमीचे प्राध्यापक शशिकांत देशमुख व डॉक्टर वृषाली देशमुख यांच्याकडे गायनाचे अध्ययन करत आहे. या अगोदरही शर्वरीने अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले आहेत, शर्वरीला केंद्र शासनाची सी.आर. टी. स्कॉलरशिप शास्त्रीय गायनासाठी प्राप्त झालेली आहे. पंडित जयतीर्थ मेऊंडी ,विदुषी मंजुषा पाटील, पं. रघुनंदन पणशीकर, इत्यादी अनेक जेष्ठ कलावंतांनी शर्वरीच्या गायनाचे कौतुक केलेले आहे, शालेय अभ्यास आणि रियाज या दोन्हीला बॅलन्स करत शर्वरी आपला सांगितिक प्रवास करत आहे. तिच्या या यशाबद्दल अतुल देऊळगावकर, डॉ. अजित जगताप आवर्तन प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभय शहा सचिव डॉ. रविराज पोरे, डॉ. संदीप जगदाळे प्रा. हरीसर्वोत्तम जोशी प्रा. शशिकांत देशमुख डॉ. वृषाली देशमुख, दिनकर पाटील, संजय सुवर्णकार व समस्त आवर्तन व आरोह परिवाराच्या वतीने अभिनंदन केले आहे.