30.7 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeआंतरराष्ट्रीयलता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त

लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त

भारतरत्न लता मंगेशकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

‘लब हिले तो मोगरे के फूल खिलते हैं कहीं’… 

लताबद्धल लिहिताना गुलजारच्या या ओळींचा आधार घ्यावासा वाटतो! लता नुसते गात नाही, तर ती स्वतःच गाणं बनते. लताचं वैशिष्ट्य म्हणजे, तिचा सोनेरी स्वर आणि भावपूर्ण उच्चार! गाण्यात ती आपला आत्मा मिळवून गाते. प्रत्येक सुराचं आकलन करणारी तीव्र संवेदनशीलता, संगीतातील नाट्याची अचूक समज, स्वरांचे आघात, स्वर कुठं लावावा आणि कुठं कमी करावा याचं तारतम्य, मधुर हेलकावे.. हे सारं लताला जन्मजात मिळालंय. एकदा सलिलदांनी सांगितलं होतं की, ‘दो बिघा जमीन’ चित्रपटाच्या प्रारंभी जी टायटल्स येतात, त्यावेळी सलिलदांनी जे पार्श्वसंगीत दिलंय, ते केवळ एकदा ऐकून लतानं जसंच्या तसं बिनचूक म्हणून दाखवलं होतं!

शैलेंद्रनेच लताची आणि सलिलदांची ओळख करून दिली. लताच्या निरीक्षण आणि ग्रहणशक्तीमुळं तलतही प्रभावित झाला होता. अशा गोड गळ्याच्या गायिका बऱ्याच आहेत. पण भावपूर्ण पद्धतीनं रसपरिपोष करण्याचं खास तंत्र लताकडं आहे. लताचे उर्दू शब्दांचे उच्चार ऐकून उर्दूतले विद्वानही चकित होत. तलतनं एक किस्सा सांगितला होता. ‘मेहरबानी’ चित्रपटाच्यावेळी त्याच्या सोलो गीताचं रेकॉर्डिंग होतं. अनेकदा रिहर्सल करूनही गाणं मनासारखं होत नव्हतं. तेवढ्यात लता आली. तिला पाहताच संगीतकार हाफिज खान म्हणाले की, तलत, तुमचं गीत बाजूला ठेवा. आता अगोदर तुमचं नि लताचं युगलगीत आटोपू. तेव्हा लतानं त्याला नकार दिला. आधी तलतचं सोलोगीत होईल, मगच मी युगलगीत गाईन, असं तिनं बजावलं. खरं तर हा तिच्या मनाचा मोठेपणा! बदकाच्या पिलांनी पाण्यात जितकं सहजपणे पोहावं, तितक्याच सहजपणे लताचा सूर गाण्यात विहरतो. नौशादकडून ऐकलेला एक किस्सा. ‘चांदनी रात’ या चित्रपटासाठी एक गीत घ्यायचं होतं. लता भर पावसात आली होती. तिच्या हातात फाटकी छत्री होती. परळ टी टीवरून ती कारदार स्टुडिओत चालत आली होती. आज मी नेहमी बघतो की, तिथं एकेकाळी कारदार स्टुडिओ होता, हेच कोणाला माहिती नाही! सध्या तिथं सगळीकडं गॅरेजेस आहेत. नौशादच्या छायेखालील ते पहिलं रेकॉर्डिंग झालं, तेव्हा लताचा आवाज त्यांना पातळ वाटला आणि जिच्यासाठी ती गात होती, ती नटी तर प्रौढ नि ढोली होती. लतानं पुन्हा मेहनत घेतली. पुन्हा रेकॉर्डिंग झालं, तेव्हा मात्र लताच्या स्वरातला भरगच्चपणा आणि गोलाई पाहून सगळेजण थक्क झाले. निर्माते ए हसन यांनी लताला खुश होऊन त्यावेळी ६० रुपयांचे बक्षिस दिलं होतं. लता उर्दू शब्दोच्चारांवर खूप मेहनत घेत होती. कारदार यांच्यासारखा निर्माता देखील लतानं गायलेलं ‘कौन सुने फरियाद हमारी’ हे गाणे ऐकून प्रभावित झाला होता. त्यानंतर नौशादनं संगीत दिलेल्या ‘अंदाज’चं रेकॉर्डिंग मेहबूबमध्ये झालं. ‘कौन सुने फरयाद हमारी’ हे गाणे स्टुडिओत बसून राज कपूर मन लावून ऐकत होता… त्याच वर्षी राजच्या ‘बरसात’ मध्ये लतानं अक्षरशः विक्रमी सूर बरसात केली.. ‘अमर भूपाळी’ ची ‘नको दूर देशी जाऊ सजणा’ हे शोकगीत असो किंवा ‘नको बोलू रे’ ही जोरकस शृंगारिक ढंगाची लावणी असो, लता ती लीलया गाते. कित्येक वर्षांपूर्वी अपोलो बंदरला शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण समारंभ होता. वसंत देसाईंनी एक हजार मुलांना घेऊन शिवमंगलस्तोत्र बसवलं होतं. यशवंतराव, अत्रे, बाळासाहेब देसाई तिथं उपस्थित होते. लता दूर बसली होती. लता ही शिवप्रेमी आहे. ते वातावरण बघून भारावलेली लता तडक वसंतरावांकडं येऊन म्हणाली की, मला आज गाणं म्हणायचंय. तेव्हा तिथल्या तिथंच एक गाणं लतानं बसवून, साथीदारांना तयार करून, ते सादरही केलं! टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.. माणसात जशी माणुसकी, तसं गाण्यात गाणेपण हवं आणि लताच्या कोणत्याही गाण्यात शंभर टक्के हे गाणेपण सापडतं. कुमार गंधर्व म्हणाले होते की, नादमय उच्चार हे लताचं वैशिष्ट्य आहे. बालगंधर्वांनी लोकप्रियतेची कमाल केली, पण महाराष्ट्राबाहेरील प्रांतांत बालगंधर्वांची तेवढी जादू जाणवली नाही. उलट लताची कीर्ती सातासमुद्रापार गेली. असा कलाकार शतकातून एकदाच निर्माण होतो, हे कुमार गंधर्वांचे बोल आहेत. लता ही भगवंताची बासरी आहे. ९२ वर्षांच्या लता मंगेशकर यांना माझ्यासारखे असंख्य लोक आपुलकीच्या भावनेतून ‘लता’ असं एकेरीतच संबोधतात. कारण ती कोणी परकी नाहीच. चिल्लर नट्या किंवा दोनचार हिट गीतं गायली की, स्वतःला हाय-फाय सेलिब्रिटी समजणाऱ्या गायिका चटकन मावळतात. लता मात्र ‘कहीं दीप जले कहीं दिल’ याप्रमाणे तेवतच होती आणि तेवतच राहणार आहे. ती असताना आपण या जगात आहोत, या पलीकडं दुसरं आनंदनिधान ते कोणतं! हा आनंदघन आपल्या मनाला सदैव न्हाऊ घालतच आहे! सामान्यतः स्त्रियांचा आवाज काळी चार पांढरी पाचपर्यंत मर्यादित असतो. त्या फार उंच स्वरात गाऊ शकत नाही. लता मात्र तशी गाऊ शकते. आज लताचा वाढदिवस. तिला कोटी कोटी शुभेच्छा! ‘हाय रे वो दिन क्यूं ना आये, जा जा के ऋतू लौट आये’ अशीच भावना आपल्या सर्वांची आहे!

हेमंत देसाई 

( साभार : फेसबुक )

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]