नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांना प्रोत्साहनपर
अनुदान देऊन बळीराजाचा सन्मान- आ. कराड
लातूर दि.२८ – गेल्या दोन वर्षांपासून वेगवेगळ्या आपत्तींना तोंड देतानाही नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या बळीराजाला ५० हजार रुपये पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय घेऊन राज्यातील १४ लाख शेतकरी कुटुंबाना दिलासा दिल्याबद्दल भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांनी शिंदे-फडणवीस सरकारचे अभिनंदन केले आहे.
नियमित कर्ज परत फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन रक्कम देण्याचे आश्वासन देऊनही महाविकास आघाडी सरकारने त्याची अंमलबजावणी केली नाही. केवळ कागदी घोषणा करून दोन वर्षे शेतकऱ्याची फसवणूक करणाऱ्या ठाकरे सरकारमुळे निराश झालेल्या शेतकऱ्यास या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे, असे आ. रमेशआप्पा कराड यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

शिंदे-फडणवीस सरकारच्या या निर्णयामुळे १४ लाख शेतकऱ्यांच्या सहा हजार कोटींच्या कर्जाचा बोजा हलका होणार असून थेट ऑनलाईन पद्धतीने अनुदानाची रक्कम शेतकऱ्यास मिळणार असल्याने मदतीसाठी हेलपाटे न घालता शेतकऱ्याची प्रतिष्ठा जपण्याची सरकारची भावना महत्वाची आहे, असे सांगून आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की २०१९ मध्ये अतिवृष्टी, महापुर यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे अतोनात नुकसान झालेला शेतकरी प्रत्यक्षात अडीच वर्षे मदतीपासून वंचित राहिला होता. ठाकरे सरकारने केवळ घोषणांचे गाजर दाखवून शेतकऱ्याची उपेक्षा केली. या आपत्तींनंतरच्या कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्याला देखील भाजप-सेना युती सरकारच्या नव्या प्रोत्साहनपर योजनेत समाविष्ट केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

राज्यातील ब्रह्मगव्हाण, वाघूर आणि भातसा प्रकल्पांसाठी साडेचार हजार कोटींचा निधी मंजूर करून कृषी आणि नागरी पाणीपुरवठा योजना अधिक सक्षम करण्याच्या निर्णयावर समाधान व्यक्त करुन ठाकरे सरकारच्या काळात राज्याच्या थंडावलेल्या प्रगतीला शिंदे-फडणवीस सरकारमुळे वेग येत असल्याचा दावाही त्यांनी केला. शेतकऱ्याची समस्यामुक्ती आणि शहरी भागाचा विकास यांचा योजनापूर्वक समतोल साधणारी युती सरकारची वाटचाल महाराष्ट्राला पुन्हा वैभव मिळवून देईल, असा विश्वासही भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांनी व्यक्त केला आहे.