सर्वांना सोबत घेऊन एका विचाराने मांजरा कारखान्याची वाटचाल.
— माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख :-
लातूर( वृत्तसेवा) -लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या विचारांना डोळ्यासमोर ठेवून, शेतकरी सभासदांच्या हितासाठी मांजरा कारखान्याची वाटचाल सर्वांना सोबत घेऊन सुरू असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री तथा कारखान्याचे चेअरमन सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी केले.
विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या 39 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस ते संबोधित करत होते.या सर्वसाधारण सभेस लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख,माजी आमदार वैजनाथ शिंदे, माजी आमदार त्र्यंबक भिसे, राज्य साखर संघाचे सदस्य आबासाहेब पाटील, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन श्रीपतराव काकडे,मांजराचे व्हा.चेअरमन श्रीशैल उटगे,रेणा कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, व्हा.चेअरमन अनंतराव देशमुख, संत शिरोमणीचे चेअरमन गणपतराव बाजुळगे, रेणाचे माजी चेअरमन यशवंतराव पाटील,लातूर बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे,उपसभापती सुनील पडीले,विलास कारखान्याचे व्हा.चेअरमन रवींद्र काळे,जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव, मांजराचे सर्व संचालक, कार्यकारी संचालक पंडित देसाई, जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक एच.जे.जाधव,विविध संस्थांचे पदाधिकारी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सक्षम नेतृत्वात मांजरा कारखान्याने आपली यशस्वी वाटचाल कायम ठेवून शेतकऱ्यांचे हित जपले आहे. गाळपास आलेल्या ऊसाला सातत्याने सर्वाधिक दर दिल्याने आर्थिक परिवर्तन लातूर जिल्ह्यात घडून आले.एकाविचाराने व एकदिलाने हे काम होत असल्याने हे शक्य होत असल्याचे सांगून साखर उद्योगात होत असलेले बदल लक्षात घेऊन बदलांचा स्वीकार मांजरा कारखान्याने नेहमी केला. म्हणूनच ऊस तोडणी यंत्राद्वारे ऊस तोडणीचा नवा पॅटर्न सुरू झाला. काळाची गरज ओळखून उसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मिती कारखान्याने सुरू केली. ऊसाचे वाढते क्षेत्र पाहता कारखान्याच्या क्षमतेचा विस्तार करणे गरजेचे होते. त्यानुसार गाळपक्षमतेचा विस्तार केला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच दीपावली निमित्त मांजरा कारखाना कर्मचाऱ्यांना १०% (दहा) टक्के बोनस देणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.
यावेळी आपल्या मनोगतात लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख म्हणाले की, मांजरा साखर कारखान्याने सहकार क्षेत्रात आपला लौकिक कायम ठेवला असून ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा कारखाना ही ओळख कायम ठेवली आहे. लहानपणापासून विविध कार्यक्रमासाठी साहेबां सोबत मांजरा कारखान्यांमध्ये येण्याचा योग येत होता. तेंव्हा पासून मांजरा कारखान्याशी एक भावनीक नाते असल्याचे त्यांनी सांगितले. विलासराव देशमुख साहेबांनी साखर कारखानदारीला दिशादर्शक असणारे कार्य करून शेतकरी सभासदांचा विश्वास सार्थ ठरवला म्हणूनच एक विश्वासाचे नाते निर्माण झाले व आज देखील ते नाते कायम असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन श्रीशैल उटगे यांनी आपल्या प्रास्ताविक पर मनोगतात कारखान्याच्या वाटचालीचा लेखाजोखा सर्वांसमोर मांडला. तसेच ऊस तोडणी यंत्रासाठी मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध करून दिल्या बद्दल लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे त्यांनी आभार मानले.
प्रारंभी कारखान्याचे कार्यकारी संचालक पंडित देसाई यांनी सर्व साधारण सभेसमोरील सर्व विषयांचे वाचन केले त्यास उपस्थित सभासदांनी टाळ्यांच्या गजरात सर्व विषयांना मंजुरी दिली. कार्यक्रमास शेतकरी सभासद, कारखाना खातेप्रमुख, अधिकारी,कर्मचारी,कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. सचिन सूर्यवंशी यांनी केले तर आभार संचालक ज्ञानेश्वर भिसे यांनी मानले.
—