• कृषि विभागाचे आवाहन
लातूर, दि. 10 (वृत्तसेवा) : जिल्ह्यात 10 जून 2024 अखेर सरासरी 72.1 मिलीमीटर पाऊस झालेला असून शेतकऱ्यांनी पेरणीयोग्य पाऊस झाल्याशिवा पेरणी करू नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आर. टी. जाधव यांनी केले आहे. जिल्ह्यात लागवडी लायक 6.65 लाख हेक्टर क्षेत्र असून पेरणी योग्य क्षेत्र 6.40 लाख हेक्टर आहे. जिल्ह्यात सोयाबीन हे खरीपाचे प्रमुख पीक आहे. सोयाबीन पीकास पेरणीसाठी साधारणपणे 75 ते 100 मिलीमीटर पावसाची (3 मोठे पाऊस) आवश्यकता असते. ज्या भागामध्ये अशा प्रकारचा पेरणी योग्य पाऊस झालेला नाही त्या शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे त्यांनी म्हटले आहे.

ज्या भागात पेरणी योग्य पाऊस झालेला आहे, अशा ठिकाणी पेरणी करताना बियाणे साधारणपणे 2 ते 3 सेंटीमीटरपेक्षा खाली जाणार नाही, याची दक्षता घेऊन पेरणी करावी. बियाणे 2 ते 3 सेंटीमीटरपेक्षा खाली गेल्यास बियाण्याची उगवण कमी प्रमाणात होत असल्यामुळे बियाणे वाया जाण्याची दाट शक्यता असते. या बाबत अधिक माहितीसाठी सबंधित कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक अथवा मंडळ कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सध्या लातूर तालुक्यात 78.6, औसा तालुक्यात 86.9, रेणापूर तालुक्यात 87.4, निलंगा तालुक्यात 62.2, देवणी तालुक्यात 80.4, उदगीर तालुक्यात 74.1, अहमदपूर तालुक्यात 51.4, शिरूर अनंतपाळ तालुक्यात 61.6, जळकोट तालुक्यात 25.8, चाकूर तालुक्यात 76.9 मिलीमीटर पाऊस झालेला आहे.