तावरजा मध्यम प्रकल्पातील गाळ उपसा कामास जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते प्रारंभ
• गाळ उपशासाठी नाम फाउंडेशनचे सहकार्य
• पुढील 15 दिवसांत साडेचार लाख घनमीटर गाळ उपशाचे उद्दिष्ट
लातूर, दि. 25 (वृत्तसेवा ) : जिल्ह्यात गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानाला गती देण्यात आली आहे. पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त सिंचन प्रकल्पातील गाळ उपसा करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या अंतर्गत लातूर तालुक्यातील धानारी येथील तावरजा मध्यम प्रकल्पातील गाळ उपशाच्या कामाला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते शुक्रवारी प्रारंभ झाला.

लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अमर पाटील, जिल्हा जलसंधारण अधिकारी अनिल कांबळे, तहसीलदार सौदागर तांदळे, नाम फाउंडेशनचे विलास चामे यांच्यासह परिसरातील शेतकरी यावेळी उपस्थित होते. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून हे काम होणार आहे.

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानाच्या माध्यामतून जिल्ह्यातील जास्तीत जास्त सिंचन प्रकल्पातील गाळ उपसा करून शेतामध्ये टाकण्यासाठी शेतकरी, स्वयंसेवी संस्था यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील जवळपास ५२ प्रकल्पातील गाळ उपसा करण्यास सुरुवात झाली आहे. लोकसहभाग आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून ही कामे सुरु असून यामाध्यमातून गाळ उपसा झाल्याने सिंचन प्रकल्पांची साठवण क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. तसेच हा गाळ शेतामध्ये टाकल्याने जमीन सुपीक होवून शेतीतील उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल.
अभियानामुळे शेतकऱ्यांचा दुहेरी फायदा : जिल्हाधिकारी
शेतजमीन सुपीक बनविणारी आणि सिंचन प्रकल्पांच्या साठवण क्षमतेत वाढ करणारे गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियान जिल्ह्यात अधिक व्यापक स्वरुपात राबविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या माध्यमातून शेतकऱ्यांचा दुहेरी फायदा होणार असल्याने येत्या पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या अभियानात सहभागी होवून तलाव गाळमुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा. यासोबत स्वयंसेवी संस्था, शासकीय यंत्रणांनी प्रकल्पातील गाळ उपसा अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी यावेळी केले. तसेच आगामी पावसाळ्यात सर्व सिंचन प्रकल्पांच्या काठावर वृक्ष लागवड करण्यात येणार असून यामध्येही शेतकरी, स्वयंसेवी संस्थांनी सहभागी व्हावे, असे त्या म्हणाल्या.