जिल्हा बँक आणि साखर कारखान्याचा पै-पै हिशोब होणार
महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी
भाजपा कार्यकर्त्यांनी संकल्प करावा
लोकप्रतिनिधी व पक्ष पदाधिकारी बैठकीत भाजपा नेते किरीट सोमय्या
लातूर – देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी भ्रष्टाचार मुक्त भारत निर्माण करण्याची शपथ घेतली असून भाजपा कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी संकल्प करावा असे आवाहन करून लातूर जिल्हयातील सहकारी साखर कारखान्या बरोबरच जिल्हा बँकेतील कारभाराचा एक एक पैशाचा हिशोब केला जाणार असून जे गुन्हेगार असतील त्यांच्यावर निश्चितच कार्यवाही होईल असे भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी बोलून दाखविले.
लातूर जिल्हयातील भाजपाच्या पक्ष पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या प्रमुख उपस्थितीत लातूर येथील स्वानंद मंगल कार्यालयात बुधवारी झाली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे जिल्हाध्यक्ष रमेशअप्पा कराड हे होते तर माजी पालकमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, आ. अभिमन्यु पवार, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष विनायकराव पाटील, प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर, किसान मोर्चाचे दिलीपराव देशमुख, जिप अध्यक्ष राहूल केंद्रे, शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे, शैलेश लाहोटी, संजय दोरवे, शैलेश गोजमगुंडे, बापुराव राठोड, संतोषअप्पा मुक्ता, अॅड. जयश्री पाटील, प्रेरणा होनराव, सुधीर धुत्तेकर, गोविंद चिलकुरे, रोहीदास वाघमारे, मनिष बंडेवार, साहेबराव मुळे, स्वाती जाधव, श्रृध्दा जगताप, अजित पाटील कव्हेकर, दिग्वीजय काथवटे, अमोल पाटील, विक्रम शिंदे, पंडीत सुर्यवंशी यांच्यासह जिल्हाभरातील लोकप्रतिनिधी, पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठया संखेने उपस्थित होते. यावेळी जिल्हयातील विविध प्रकरणाचे दस्तावेज किरीट सोमय्या यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
लातूर दौऱ्यात भाजपाच्या प्रमुखांनी जिल्हयातील कॉग्रेस पुढाऱ्यांची जिल्हा सहकारी बँक, मांजरा, विलास, रेणा, मारूती महाराज, किल्लारी, बालाघाट या साखर कारखान्याचे भ्रष्ट कारभाराचे कारनामे माझ्याकडे दिले असून यातील दोन कारखान्यावर दोन वर्षापुर्वीच कार्यवाही सुरू झाली आहे. या सर्व भ्रष्ट कारभारात जे जे दोषी असतील त्यांच्यावर कार्यवाही झालीच पाहिजे यासाठी प्राध्यान्याने मी प्रयत्न करणार असल्याचे सांगून किरीट सोमय्या म्हणाले की, दिवाळीनंतर जिल्हयातील भाजपाच्या प्रमुखासह ईडीच्या संबंधीताबरोबर बैठक लावून त्यांच्याकडे भ्रष्ट कारभाराचे पुरावे देवू असे बोलून दाखविले.
राज्यातील अनेक साखर कारखान्यावर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयाचे पालन करून चौकशी सुरू केली होती. मात्र विश्वासघाताने सत्तेवर आलेल्या तीन पक्षाच्या सरकारने या भ्रष्ट कारभारांना क्लीन चिट देण्याचे काम केल आहे. ठाकरे सरकार घोटाळेबाज सरकार आहे. ३१ डिसेंबर नंतर राज्यातील उध्दव ठाकरे अलिबाबा आणि चाळीस चोर यांच्यावर विविध प्रकरणातून कार्यवाही झाल्याशिवाय राहणार नाही. सरकारमधील अनेकजण जेल मध्ये जातील, कांहीजण पोलीस ठाण्यात तर कांहीजण रूग्णालयात दिसतील असेही किरीट सोमय्या यांनी बोलून दाखविले.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणी देशातील सर्वात मोठी इनकम टॅक्सची आकरा दिवसाची धाड झाली. त्यातून कोटयावधीची बेनामी मालमत्ता सापडली असल्याने या प्रकरणावरून महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी निचपणाचा प्रकार राज्यात सुरू झाला असल्याचे सांगून किरीट सोमय्या म्हणाले की, शाहरूख बद्दल आम्हाला आदर आहे पण आर्यन खान कडे कोठून ड्रग आला, ड्रग माफीया कोण आहे याची माहिती मिळणे आवश्यक आहे. जर ही माहिती मिळाली तर हजारो तरूणांचे उध्वस्थ होणारे जीवन रोखता येईल त्यांचे भविष्य वाचेल. या प्रकरणावरून समिर वानखेडे कोण, त्याची जात, धर्म, लग्न कोणत्या पध्दतीने झाले अशा प्रकारे वानखेडेचे वयक्तीक जीवन सार्वजनिक करताना यांना लाज वाटत नाही का हे मंत्र्याचे काम आहे का असा प्रश्न उपस्थित करून नवाब मलिक, तुम्हें भी तुम्हारे दात दिखाने वाला किरीट सोमय्या है असे बोलून दाखवले.
राज्यात सर्वात चांगली लातूर जिल्हा बँक, देशात एक क्रमांकाचा मांजरा साखर कारखाना, पारदर्शक कारभार, सहकार महर्षी असे कोण बोलतय असा प्रश्न उपस्थित करून संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले की, हे फक्त आणि फक्त कॉग्रेसवाले आणि कॉग्रेसवालेच बोलतात. बँकेत चांगले होते तर निवडणूकीला सामोरे जायला का घाबरलात. भाजपाच्या उमेदवारांना मतदारांनी नाकारले नाही तर अधिकाऱ्यांना हाताशी धरून सत्ताधाऱ्यांनी नाकारले. मतदाराचा मुलभूत अधिकार हिरावून घेतला. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही प्रवृत्ती थांबली पाहिजे. जिल्हा बँक शेतकऱ्यांच्या हक्काची असताना या बँकेने साखर कारखान्यांना आणि सत्ताधाऱ्यांच्या उद्योग धंद्याला कोटयावधी रूपये वाटप केले.
भ्रष्टाचाराचा खरा अड्डा लातूर आहे. शेतकऱ्यांच्या पैशावर कॉग्रेसवाल्यांनी साम्राज्य उभे केले. सहकारी साखर कारखान्यांना बंद पाडून स्वताच्या मालकीचे करून राजकारण करण्याची ही निती असून भूमाफीया, साखर माफीया, बँक माफीया या सर्व भ्रष्ट प्रकरणाची चौकशी झाल्यास अडचणीत असलेल्या राज्यसरकारला २५ हजार कोटी रूपये मिळतील अशी माहिती किरीट सोमय्या यांना यावेळी बोलताना आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी दिली.
सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर सर्वसामान्यासह विरोधकांना अडविण्याचा आणि दाबण्याचा प्रकार गेल्या ३० ते ३५ वर्षापासून लातूरात चालू आहे. अनेकवेळा लोकशाहीचा खुन करण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगून यावेळी बोलताना भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड म्हणाले की, जिल्हा बँक भाजपाच्या ताब्यात येणार याची कुणकूण लागल्याने कुटील कारस्थान करून अधिकाऱ्यांना हाताशी धरून विरोधकांचे सर्व अर्ज बाद केले. गेल्या सहा वर्षापासून जिल्हयातील सहकारी साखर कारखान्यांनी गाळप केलेल्या ऊसाला एफआरपी प्रमाणे शेतकऱ्यांना पैसे दिले नाहीत. किरीटजी हवी ती माहिती आम्ही तुम्हाला देवू, देशमुखाची काळी राजवट थांबविल्याशिवाय आता पर्याय नाही असे बोलून दाखविले.
यावेळी आ. अभिमन्यु पवार आणि माजी आमदार विनायकराव पाटील यांनी बँकेच्या आणि साखर कारखान्याच्या प्रकरणात लक्ष घालावे. दोषीवर कार्यवाही झालीच पाहिजे अशी भावना व्यक्त केली. प्रारंभी लातूर जिल्हा भाजपाच्या वतीने किरीट सोमय्या यांचे संत ज्ञानेश्वर माऊलीची मुर्ती भेट देवून स्वागत करण्यात आले. जिल्हा सरचिटणीस संजय दोरवे यांनी बैठकीचे प्रास्ताविक करून संचलन केले तर शेवटी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.